औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. अतिप्रसंगाला विरोध केल्यामुळे तरुणीला जीवे मारल्याची माहिती आहे.


दहावीत शिकणारी सीमा राठोड 15 तारखेला पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेख मुश्ताक, ज्ञानेश्वर रोठोड, भुऱ्या रोठोड आणि एका अल्पवयीन मुलाने तिला अडवलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

तिने विरोध केल्यामुळे चार नराधमांनी तिची गळा दाबून हत्या केली आणि घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील दरीत फेकले. सीमावर अत्याचार करुन हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.