औरंगाबाद : मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस पडत नसला तरी गेल्या काही दिवसांपासून नगर आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे जवळपास 80 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


जायकवाडी धरणाच्या हायड्रोमधून 1500 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. गोदावरी नदीपात्रातून आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात तूर्तास पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी काठावरील गावातील तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावातील लोकांशी आताच संपर्क करून दवंडी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नदी पात्रात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रविवारी म्हणजेच आज सकाळी जायकवाडी धरणात 80 टक्के पाणी साठा आहे. सध्या जायकवाडी धरणात 60 हजार क्यूसेक्स पेक्षा अधिक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून 1500 क्युसेक्स पाणी आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणात सध्याप्रमाणेच पाण्याची आवक सुरु राहिल्यास येत्या 5 ते 8 दिवसात धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. धरणाच्या उजव्या कालव्यातून 400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

मराठवाड्यात पाऊस का पडत नाही? | स्पेशल रिपोर्ट