मुंबई : मलप्रक्रिया केंद्राच्या जागेची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. ही घटना कल्याणमधील उंबर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


उंबर्डे गावात महापालिकेच्या मालकीची जमीन असून त्यावर मलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी आज केडीएमसीच्या नगररचना विभागाचे पथक उंबर्डे गावात गेले होते. यावेळी स्थानिक गावगुंडांनी या पथकावर हल्ला चढवत त्यांना पिटाळून लावले.

या हल्ल्यात सर्व्हेअर श्रीराम झोपळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या कल्याणच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर इतर तीन जणांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या घटनेचा केडीएमसीतल्या शिवसेना महापालिका कामगार सेनेने निषेध केला असून या प्रकरणातल्या हल्लेखोर गावगुंडांना त्वरित अटक झाली नाही, तर उद्या कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.