अहमदनगर : 'सैराट' चित्रपटातल्या आर्ची आणि परश्यावर ओढवलेलं संकट, नगरच्या चाँदमुलानी दाम्पत्यावरही ओढवलं होतं. मात्र करिश्माचं नशिब बलवत्तर म्हणून ती माहेरच्यांनी केलेल्या हल्ल्यातून सुखरुप बचावली आहे.


 
करिश्माचा पती अमीर आणि तिची सासरची मंडळी या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानाची मोठी झाले, तेच एक दिवस आपला संसार उद्ध्वस्त करतील असं करिश्माला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

 
गेल्या वर्षी करिश्माचा प्रेमविवाह तिचा मामेभाऊ आमीर चाँदमुलानीशी झाला. करिश्माच्या कुटुंबियांचा त्या प्रेमविवाहाला कट्टर विरोध होता. करिश्मा आणि आमीरनं पुण्यात जाऊन संसार मांडला.

 
थोडासा काळ लोटल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असं करिश्माला वाटलं. वरवर तरी तसंच दिसत  होतं. म्हणूनच कर्जत तालुक्यातील ताजु गावची जत्रा आली, तेव्हा करिश्माच्या सासरऱ्यांनी दावतचा बेत आखला.

 
त्या दावतसाठी करिश्माच्या माहेरच्यांनाही निमंत्रण देण्यात आलं. करिश्माची माहेरची मंडळी आली खरी, मात्र दावतसाठी नव्हे तर करिश्मावर सूड उगवण्यासाठी. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

 
सैराटमधील रिंकू किंवा परश्या असो, अथवा खऱ्याखुऱ्या आयुष्यातील करिष्मा आणि आमीर... प्रेमविवाहासाठी दाखवलेल्या धाडसाची मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागत आहे. प्रेमाचं प्रतिक म्हणून राधा-कृष्णाला पुजणारे आपण प्रत्यक्षात प्रेमाची पूजा आणि आदर करायला कधी शिकणार, हा सवाल कायम राहतो.

 

 

संबंधित बातम्या :


प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला


'सैराट'च्या 'आर्ची-परशा' प्रमाणे 'रवी-मनिषा'चा अंत