मुंबई : मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज आणि इच्छुक असल्याचं सांगणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांच्या वक्तव्याचा नेहमी उलटा अर्थ घ्यावा, असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पवारांच्या ट्वीटला ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.


'दूरदृष्टी असलेल्या जाणत्या राजाच्या भाकिताचा नेहमी उलटा अर्थ घ्यावा, असं राजकीय विश्लेषक म्हणतात. म्हणूनच मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही. सरकारला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहेच!! तसा भाजपाला विश्वास आणि खात्रीही आहेच!!' असं ट्वीट आशिष शेलारांनी केलं आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/831366912449900544

https://twitter.com/ShelarAshish/status/831366992384946176

राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. मध्यावधी निवडणुकांनी राज्याचं फार नुकसान होणार नाही, असा ट्विटर बॉम्ब शरद पवार यांनी टाकला आहे. पवारांनी मध्यावधी निवडणुकांची तयारी दाखवल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. रविवारी ठाण्यातील सभेत पवारांनी सत्तेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेला डिवचलं होतं.

https://twitter.com/PawarSpeaks/status/831188051086893056

https://twitter.com/PawarSpeaks/status/831188290501947392

युती सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकीतही पवारांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. महापालिका निवडणुकांनंतर काही तरी मोठी राजकीय घटना घडेल, असंही पवार म्हणाले होते.

'भाजपकडून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. पण महापालिकेत शिवसेना आणि भाजप सत्तेत आहे. शिवाय शिवसेनेचे नेते गुंडगिरी करतात, असा भाजपचा आरोप आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे ही जबाबदारी कुणाची' असा सवाल करत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला होता.

उद्धव ठाकरे हे अगदी मोदींपासून राज्यातील भाजपवाले कसे आहेत हे सांगतात आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसतात. शिवसेनेला सत्तेची ऊब बाहेर पडू देत नाही, असा टोलाही शरद पवारांनी शिवसेनेला लगावला.

संबंधित बातम्या :


मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी सज्ज : शरद पवार