नागपूर : आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई करा अशा आशयाचे एक पत्र काँग्रेस पक्षाच्या नेत्याने लिहिले आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


2002 मध्ये मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आरोप सुनील केदार यांच्यावर आहेत. याप्रकरणी केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे... हा खटला गेली 19 वर्षे कोर्टात सुरु आहे... आता याप्रकरणी सरकारी वकील म्हणून आसिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आसिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत.. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोप करीत आसिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. सोबतच मंत्री सुनील केदार यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करावे अशी मागणी करणारे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.






अशिष देशमुख यांनी म्हटलं आहे की, मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला होता. जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता. आज 19-20 वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती केली. ॲड. आसिफ कुरेशी हे महाराष्ट्र काँग्रेस  कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली आहे.