Ashadhi Ekadashi 2023:  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता (Pandharpur) वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) राज्यभरातून 5000 विशेष गाड्या (Special ST Bus) सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 25 जून  ते 5 जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (27 जुन रोजी) 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 


पंढरपूर आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari) एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 


कोणत्या विभागातून किती बसेस?


आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे 5000 गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर भागातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 विशेष गाड्यांचे नियोजन पंढरपूरसाठी करण्यात आले आहे.  


चार तात्पुर्ती बस स्थानके उभारणार


पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.


दरम्यान, यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे.  तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे. अन प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे. 


तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला आळंदीमधून  प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये  पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल.