Ashadhi Ekadashi 2022 : कोरोनामुळे (Coronavirus) गेली दोन वर्ष निर्बंधांमध्ये आषाढी वारी (Ashadhi Wari 2022) पार पडत होती. यंदा मात्र निर्बंधमुक्त वारी पार पडणार आहे. दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी  (Ashadhi Ekadashi) देशभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक सध्या पंढरपूरकडे येत आहेत. आषाढी एकादशीला आठवड्याचा अवधी असताना आताच पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. खरंतर पालखी सोहळे पंढरपूरच्या (Pandharpur) नजीक आल्यावर दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचत असते, यंदा मात्र अजून पालख्या जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाविकांच्या गर्दीनं विक्रम गाठला आहे. त्यामुळे यंदा विक्रमी यात्रा भरणार असल्याचं चित्र दिसत आहे. 
     
विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिराजवळील सात माजली दर्शन मंडपातून विणे गल्ली माहे चंद्रभागा तीरावरून गोपाळपूर येथे उभारलेल्या 10 पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. या पत्राशेडच्या पुढे जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्वेरि इंजिनियरिंग कॉलेजपर्यंत बांबूचं शेड बांधून दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. गरज भासल्यास ही लांबी अजून वाढवण्यात येणार आहे. या दर्शन रांगेवर पत्र्याचं आवरण घातल्यानं पावसातही भाविक भिजणार नाहीत. यात्रेच्या शेवटच्या तीन दिवसांत दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला चहा, नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था मंदिर समितीनं केली आहे. यासाठी दोन मोठे देणगीदार पुढे आले असल्याचं व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं आहे. सध्या दर्शन रांगेत पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविक असून आज दर्शनासाठी 8 ते 10 तास एवढा कालावधी लागणार आहे. 




आषाढीपूर्वीच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला


एकीकडे आषाढीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मंदिर समिती कायद्यानुसार, नवीन समिती स्थापन करेपर्यंत मंदिरावर प्रशासक सभापती म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांना पदभार सांभाळावा लागणार आहे. मंदिर समितीच्या कायद्यानुसार नियुक्त समितीची मुदत पाच वर्षाची असते. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षांपूर्वी ही समिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली होती. 3 जुलै रोजी या समितीचा कार्यकाळ संपला आहे. पण सध्या अजून राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं नसल्यानं आषाढीपूर्वी नवीन समितीची निवड करणं अवघड आहे. अशा वेळी नियमानुसार, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून कार्यभार सोपवण्याची तरतूद आहे. आता नवीन मुख्यमंत्र्यांना यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून तातडीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :