पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न  झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.


दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून  विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.


केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत. गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते . आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली. 


यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या वॉटरप्रूफ प्रतिमांचा अनावरण सोहळा पार पडला. सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिरही कुलूपबंद आहे. या वेळेचा सदुपयोग करीत मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहे. लॉकडाऊन लांबला तर जगभरातील विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे.


दरम्यान, टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर... रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या दहा पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. कोरोना संकटामुळे केवळ मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत 40 वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे. 


संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत चांगावटेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, संत निळोबा महाराज पालखी, संत मुक्ताबाई पालखी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.


पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी


षाढी यात्रेसाठी पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यभरात कोरोनाचं सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.