Nagpur News : यंदा दिवाळीत कोणतेही निर्बंध नसले तरी शहरातील अनेक संस्था, संघटना व शासन स्तरावरही प्रदूषणमुक्त दिवाळी (eco friendly Diwali) साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नागरिकांनी दिवाळीच्या पर्वावर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. सायंकाळपासून सुरु झालेले फटाके फोडण्याचे सत्र चक्क मध्यरात्रीपर्यंत सुरुच होते. त्यामुळे वातावरणात त्याचे परिणाम दिसून आले. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वातावरणात धुराची चादर पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते.


मंगळवारी, शहरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) सिव्हिल लाईन्स केंद्रात वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 201 नोंदवला गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार 50 ते 100 एक्यूआय हा समाधानकारक मानला जातो. त्यावर गेल्यास खराब स्थिती गणली जाते. प्रत्यक्षात सिव्हिल लाईन्समध्ये नागरी वसाहतीची घनता नाही. यामुळे फटाकेही कमी फुटतात, वाहनांची वर्दळ कमी आणि झाडे मात्र मोठ्या संख्येने आहेत. 


मेडिकल, महाल 300च्या वर?


सिव्हिल लाईन्स सारख्या भागात जर एक्यूआय 201 वर असेल तर महाल, मेडिकल चौक सारख्या भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या पुढे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ हवेची गुणवत्ता अत्यंत खराब स्थितीत गेल्याचे म्हणावे लागेल. एमपीसीबीची शंकरनगर (Shankar Nagar), हिंगणा टी पॉइंट (Hingna T Point), महाल (Mahal), मेडिकल चौक (Medical Square), एलआयटी आणि व्हीएनआयटी (VNIT) आदी ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत. मात्र, एमपीसीबीतर्फे केवळ सिव्हिल लाइन्समधला डेटा अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे नीरीसारख्या संस्थेला वायू गुणवत्तेचे अॅनॅलिसिस करणे कठीण होते.


शहरातील इतर भागांचे काय?


मात्र, सिव्हिल लाईन्समध्ये एसक्यूआय 201वर गेले तर इतर ठिकाणी स्थिती आणखी वाईट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फटाक्यांमुळे शहराची हवा खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वातावरणात पसरलेल्या धुरामुळे अनेकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यात बाधा यासारखा त्रास जाणवत आहे. आता मूळ स्थितीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. थंडीचे धुके आणि फटाक्यांच्या धुरामुळे संसर्गही वाढणार आहे. वातावरण बदलामुळे येत्या काही दिवसांत सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गासारख्या समस्या वाढण्याची शक्यता आहे.


इतर महत्त्वाची बातमी


Arvind Kejriwal PC : चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित करा : अरविंद केजरीवाल