मुंबई: कोल्हापूरच्या बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगाने पावलं टाकली आहेत. याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.


सांगलीच्या कुपवाडमधून एका व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर याच प्रकरणात राजेश पाटील नावाच्या इसमाला कळंबोली पोलिसांनी जळगावातून अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं.

यापूर्वी सर्वात आधी अश्विनी बिद्रे यांचा प्रियकर पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली आहे.

अभय कुरुंदकर तीन वर्ष सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना, त्याचा संपर्क एका व्यापाऱ्य़ाशी वारंवार आला. बिद्रे गायब होण्याआधी कुरुंदकरने राजेश पाटील आणि त्या व्यापाऱ्याला वारंवार फोन केल्याचं उघड झालं.

त्यामुळे रविवारी रात्री कुपवाडाहून या व्यापाऱ्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय. हा व्यापारी कुरुंदकरचे आर्थिक व्यवहार पाहत असल्याची चर्चा आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तपासात पोलिसच त्याना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.
एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

अश्विनी आणि अभय यांच्यात वाद

यावेळी अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले. गेल्याच महिन्यात ते पुन्हा रुजू झाले होते.

संबंधित बातम्या

घराला नवा रंग, कुरुंदकरांनी बिद्रेंचा घातपात केल्याचा संशय

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत

बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण