सांगली : मागील सरकारमध्ये 5 वर्ष कृषी राज्यमंत्री राहिलेले सदाभाऊ खोत लॉकडाऊन काळात एक आंदोलन उभारत आहे. लॉकडाऊन चालू असताना देखील सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन एका आंदोलनाची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी खोत यांनी लॉकडाऊनचा कोणताही  नियम मोडला जाणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.


'अंगण हेच माझे आंदोलन' या स्लोगनखाली हे आंदोलन 15 मे पासून राज्यभर उभारले जाणार आहे.  हे आंदोलन अंगणात, शेतात बसून केले जावे आणि सरकार दरबारी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी दाखवून द्याव्यात असे आवाहन खोत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.




शेतकऱ्यांचा सातबारा आणि विविध प्रश्नावर हे आंदोलन करण्यात येत असून तमाम शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलनामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन माजी मंत्री खोत यांनी केले आहे.


कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून या शेतकऱ्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून कोरोनाच्या या स्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.


काय आहेत मागण्या

रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. अंगण हेच माझे आंदोलन अशा स्वरूपाचे हे आंदोलन असून शेतकऱ्यांचा साता बारा कोरा करावा, आधारभूत किंमतीने शेती माल खरेदी करावे किंवा प्रति क्विंटल 1 हजार या अनुदान देण्यात यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी, दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळं फळ-भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, त्याच बरोबर रेशनकार्ड नसणाऱ्या कामगार, शेत मजुरांना मोफत धान्य आणि 2 हजार रुपये भत्ता देण्यात यावा, तसेच शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.