अहमदनगर : सरकारच्या अर्थसंकल्पावर अनेक मत मतांतरे मांडली जात आहेत. सत्ताधारी समर्थन करत आहेत, तर विरोधक टीका करत आहेत. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अर्थसंकल्पावरुन विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे.


शेतकऱ्यांना धोका देणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप अण्णांनी केला. लाखो  शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच तरतूद नाही, असं अण्णा म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि खासदार जास्त कष्ट करत असल्याने त्यांच्या  पगारात घसघशीत वाढ केल्याचा टोमणा अण्णांनी मारला. कष्टकरी शेतकऱ्यांना पेन्शन जाहीर करणं अपेक्षित असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. मात्र सरकार शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणं असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याचं अण्णा म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हातात चावी असून येत्या काळात शेतकरीच सरकारला शिकवतील. शेतमालाचे दर, स्वामीनाथन आयोगावर काहीच केलं नाही. या अर्थसंकल्पात भुरळ घालणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या तरतुदी आहेत. या विरोधात शेतकर्‍यांत जनजागृती करुन 23 मार्चला दिल्लीत आंदोलन करुन निषेध करण्याचा ईशारा अण्णांनी दिला. या माध्यमातून सरकारच्या अधोगतीची वेळ आल्याचंही अण्णांनी म्हटलं.

संबंधित बातम्या

Budget 2018: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार! 

अर्थसंकल्प 2018 : पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, काय-काय महागलं? 

अर्थसंकल्प 2018 : सर्व रेल्वेत सीसीटीव्ही आणि वायफाय मिळणार 

अर्थसंकल्प 2018 : जेटलींनी देशातील शेतकऱ्यांना काय दिलं? 

येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली