नगरच्या शेतात अंजली तेंडुलकरांचा फेरफटका, शेतकऱ्याच्या घरी जेवण
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2017 09:54 AM (IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली यांनी अहमदनगरच्या पाथर्डीतल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अहमदनगर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली यांनी अहमदनगरच्या पाथर्डीतल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेतीतज्ज्ञ कलीआ चाँदमल यांच्यासह अंजली भट्टेवाडीत दाखल झाल्या. यावेळी शेतकऱ्यांनी विविध फळं देऊन त्यांचं स्वागत केलं. कलीआ चाँदमल या अंजली तेंडुलकरच्या मावस बहीण आहेत. त्यांच्या संस्थेकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंदर्भात मार्गदर्शन केलं जातं. याच कामाची पाहणी करण्यासाठी अंजली यांनी पाथर्डी गाठली. यावेळी अंजली यांनी शेतकऱ्यांच्या घरी दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. तसंच पुढच्या वेळी सचिनसोबत येण्याचं आश्वासनही दिलं. अंजली या रविवारी दुपारी एक वाजण्याच्या कोणताही गाजा वाजा न करता आलीशान गाडीतून करंजीत भट्टेवाडीत दाखल झाल्या. करंजीत भट्टेवाडीला सोशल सेंटर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. श्रीमती कमीआ चाँदमाल आणि अॅलीक्स मायकल शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याविषयी मार्गदर्शन करतात, त्यामुळं आपल्या बहिणीचं ग्रामीण भागातील काम पाहण्यासाठी अंजली यांनी करंजी गाठली. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीचं प्रात्यक्षिक पाहिलं. नैसर्गिक पद्धतीची चिकू, संत्रा, मोसंबी, केळी, वांगे ,पालकभाजी , कोथिंबीर या फळबागांची पहाणी केली.