Tirupati Laddu Controversy : तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची पुष्टी झाली आहे. प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात गोमांस, डुकराची चरबी तसेच फिश ऑईल आढळून आलं आहे. सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने (टीडीपी) दावा केला आहे की गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेने या भेसळीची पुष्टी केली आहे. प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी गोमांस चरबी, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचं टीडीपीनं म्हटलं आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.


देवस्थान समिती सदस्य मिलिंद नार्वेकर काय म्हणाले?


प्रसादाच्या लाडूत चरबी आढळून आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिरुपती देवस्थान समितीचे Tirumala Tirupati Devasthanams (TTD) सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी (Milind Narvekar on Tirupati Laddu Controversy) या वादावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर यांनी एका वाक्यात मला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि अत्यंत निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकर यांची ऑक्टोबर 2021 मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे सदस्य म्हणून शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर आंध्र प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मिलिंद नार्वेकर यांची टीटीडी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. आंध्र प्रदेश सरकारने TTD मध्ये 24 सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.


पवन कल्याण काय म्हणाले?


उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर सांगितले की, "तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस फॅट) मिसळली जात असल्याने आम्ही सर्वजण खूप त्रस्त आहोत. तत्कालीन वायसीपी सरकारने टीटीडीची स्थापना केली होती. मंडळ कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध आहे, परंतु मंदिरे आणि इतर धार्मिक प्रथा यांच्या अपवित्रतेशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकते. ते पुढे म्हणाले, “आता राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म रक्षा मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, प्रसारमाध्यमे आणि यावर राष्ट्रीय स्तरावर आपापल्या क्षेत्रातील इतर सर्व लोकांनी चर्चा केली पाहिजे. मला वाटते की आपण सर्वांनी एकत्र येऊन 'सनातन धर्माचा' कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवला पाहिजे."


मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप 


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (18 सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या