Amravati Voilance : अमरावती शहरात संचारबंदीत शिथिलता देण्यात असून शहरात कायदे आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 13 तारखेपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संचारबंदीत सूट देण्याचा आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आजपासून सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ ही उघडण्यात आली. या संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना अंदाजे तब्बल 800 कोटींचा फटका बसला असल्याची माहिती अमरावतीतील महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली आहे. 


अमरावतीत हिंसाचारानंतर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळं शहरातील व्यापार-उद्योगांची तब्बल 700 ते 800 कोटींची उलाढाल थांबलेली आहे. इंटरनेट सेवा बंद आहे, त्यामुळे बँकिंग सेवाही बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला असल्याची माहितीही महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 


आजपासून सकाळी 9 ते  सायंकाळी 6 दरम्यान सवलत देण्यात आली आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. तर दुसरीकडे काल (शुक्रवारी) दुपारी 3 वाजता इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. सात दिवस इंटरनेट सेवा बंद असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांनासह सगळ्यांनाच बसला होता. पण आता हळूहळू अमरावती पूर्वपदावर येत आहे. 


दरम्यान, त्रिपुरातील (Tripura Violence)घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले. यात अमरावतीमध्ये वातावरण खूप तणावाचे झाले होते. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.अमरावतीत निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होती. मोर्चादरम्यान अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली होती. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंदही पुकारण्यात आला होता.


बांग्लादेशमध्ये काय घडलं?


ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्गापूजेदरम्यान बांग्लादेशात हिंसाचार झाला. बांग्लादेशातील चांदपूर, कमिला जिल्ह्यांमध्ये दुर्गापूजेदरम्यान तोडफोड करण्यात आली. दुर्गापूजा स्थळावर कुराण आढळल्याच्या आणि कुराणाचा अपमान झाल्याच्या कथित प्रकरणानंतर हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर चांदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंज, काक्स बाजार या परिसरात घरांची, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. अनेक नागरिक जखमी झाले होते.