Amravati Violence : त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून इंटरनेट सेवा सुरु होते की, बंदच राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तिकडे अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. काल सकाळी अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती. 




किरीट सोमय्या (Kirit Somaiya) उद्या (बुधवारी) अमरावती दौऱ्यावर जाणार होते. परंतु, त्यांच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलंय की, "आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे." तसेच, ट्वीट करताना किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राची प्रत जोडली आहे. 



अमरावती हिंसाचाराप्रकरणी अनिल बोंडेंना जामीन


माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना (Anil Bonde Arrest) जामीन मिळाला आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली होती. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद  करण्यात आले आहेत. भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे  जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली होती. 


पाहा व्हिडीओ : अमरावतीतील इंटरनेट सेवा दुपारनंतर पूर्ववत होण्याची शक्यता



अमरावतीमध्ये मागील तीन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर आज संचारबंदी (Amravati Curfew) लागू करण्यात आली आहे. त्रिपुरातील घटनेनंतर शुक्रवारी काही संघटनांनी काढलेल्या मोर्चात तोडफोड करण्यात आली.  आता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपनं काल (14 नोव्हेंबर) अमरावती जिल्हा बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, हिंसाचाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यानं जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही तीन दिवस बंद ठेवण्यात आलं आहे.


दरम्यान, अमरावती, नांदेड आणि मालेगावात घडलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीनं भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी तीन शहरात दंगली घडवण्याचं षडयंत्र भाजपनं रचलं, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. यामागे भाजप नेते अनिल बोडेंसह अनेक नेत्यांचा हात आहे, असा आरोपही मलिकांनी केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :