Amravati MP Navneet Rana News : अमरावती शहरात (Amravati News) आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


'तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला'


नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटलं आहे की, पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावती येथील पोलिस ठाण्यात धडकल्या. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येनं गर्दी पोलिस ठाण्यात झाली आहे. 


नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आरोप करताना म्हटलं की, अमरावतीची बदनामी का होत आहे. 19 वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणलं आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही.  मात्र मुलगी कुठं आहे याबाबत उत्तरं दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथं पकडून आणा, एका तासात सगळं बाहेर येईल, असंही राणा म्हणाल्या. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम दिला असल्याचं राणा म्हणाल्या. या मुलांचा एक समूह आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. 


माध्यमांशी बोलताना मुलीच्या पालकांनी सांगितलं की, माझी मुलगी 12.30 वाजता बॅंकेत गेली. मात्र तिचा फोन नंतर बंद झाला. आमच्या घरी तो मुलगा कधीच आलेला नाही, असं या मुलीच्या पालकांनी सांगितलं. 


पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत -भाजप खासदार अनिल बोंडे


भाजप खासदार अनिल बोंडे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, धारणी आणि अमरावतीची दोन अशी प्रकरणं आहेत. धारणीच्या मुलीला हैदराबादला नेण्यात आलं आहे. त्या मुलीनं देखील फोन करुन मला अमरावतीला यायचं आहे. धारणी आणि अमरावतीच्या पोलिसांना मी विनंती केली होती की, त्या मुलींना शोधून सोडवून आणा. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये जेवढं गांभीर्य दाखवायला हवं होतं, तेवढं गांभीर्य दाखवलेलं नाही. धारणीमध्ये वीस प्रकरणं अशाच प्रकारची झाली आहेत तर अमरावतीमध्ये चार प्रकरणं झाली आहेत. या मुलींचे पालक तक्रारी घेऊन गेले तर त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत, असं खासदार बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.