अमरावती : बँक खात्यातून तब्बल 8 लाख 60 हजार रुपये लंपास झाल्याची घटना अमरावती शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. पासवर्ड किंवा ओटीपी शेअर न करताही झालेल्या या चोरीमुळे खातेदारांसह बँक कर्मचारीही चक्रावले आहेत.


अमरावती शहरातल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' आणि 'बँक ऑफ इंडिया' या दोन बँकांमधल्या 9 खातेदारांनी ही तक्रार केली आहे. यातल्या एकाही खातेदाराने आपला गोपनीय क्रमांक कुणालाही दिला नसल्याचं सांगितलं आहे. तरीही खात्यातून आपोआप रक्कम लंपास झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम हरियाणा, आसाम, गुरुग्राम आणि दिल्लीतल्या एटीएम सेंटरमधून काढलं जात असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे या हायटेक चोरीच्या फंड्याचा पर्दाफाश करण्याचं आव्हान अमरावतीच्या पोलिसांसमोर आहे.