नागपूरः अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची पंकजा मुंडे यांच्यावर बोलण्याएवढी उंची नाही. पंकजा मुंडे रक्ताने भाजपच्या कार्यकर्ता आहेत, त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या राष्ट्रीय नेत्या असून मध्य प्रदेशाच्या सह प्रभारी आहेत. ते कधीच भाजप सोडण्याचा विचार ही करू शकत नाही. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी स्वप्न पाहू नये. जयंत पाटील यांनीच अमोल मिटकरी यांना विचारणा करावी. तसेच मिटकरी यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे आणि त्यांच्या पक्षात येत्या काळात काय घडणार आहे, याकडे लक्ष द्यावे, असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काढला. अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या वक्त्व्यावर त्यांनी मिटकरींचा समाचार घेतला.


हिवाळी अधिवेशनात नागपूर जिल्ह्यासाठी 5 हजार कोटींच्या कामांना मंजूरी


नागपूर जिल्ह्याचा विकासासाठी (Nagpur District Development) फडणवीस सरकारने जाहीर केलेली सर्व कामे महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम अडवून ठेवली होती. जीआर, सूचना प्रकाशित झाल्यावरही कामे थांबविण्यात आली होती. दीक्षाभूमीचा 100 कोटींचा विकास प्रकल्प (Development Project) थांबवला होता. ताजबागचा विकास प्रकल्प थांबवला होता. नागपुरात पाणी आणण्यासाठी मोठ्या भुयाराचा 2700 कोटींचा काम थांबवला होता. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील या सर्व थांबवलेल्या प्रकल्पांना मान्यता द्यावी अशी आमची मागणी आहे.. यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागला आहे. एकूण पाच हजार कोटींच्या विकास कामांना थांबवण्यात आले होते. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सर्व पाच हजार कोटींच्या कामांना मंजूरी घेण्यात येईल.


यावेळी बावनकुळे यांनी भरत गोगावले (Bharat Gogawale ) यांच्या वक्त्त्यावर बोलताना म्हणाले, भरत गोगावले काय म्हणाले, हे मला माहीत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्वच पक्षांना मान्य करावे लागेल. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हालाही मान्य राहील, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.


अमोल मिटकरी काय म्हणाले होते?


गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला मात्र सुडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. हे रोहिणी खडसेंना लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांच्याही लक्षात यायला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. राष्ट्रवादीने काढलेल्या संवाद यात्रे निमित्ताने अमोल मिटकरी जळगाव जिल्ह्यात बोडवड सभेत बोलत होते. मिटकरी म्हणाले की, "आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर करतील. 12 आमदाराच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसत आहे. रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या तशाच पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावं."