औरंगाबाद : ओबीसी समाजाचे यापुढचे मोर्चे रद्द पण आज आभार मोर्चा निघणार, अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचे आश्वासन  मिळाल्याने पुढचे सर्व मोर्चे रद्द केल्याचं समीर भुजबळांनी म्हटलंय.


महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले होते. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा भागामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी मराठवाड्यातून वेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आभार मानले.


औरंगाबाद येथील आजचा हा मोर्चा नसून तो आभाराचा मेळावा आहे, असंही समीर भुजबळ म्हणाले. यापुढे महाराष्ट्रमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार नाही. ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे नियोजित आंदोलन होते त्या ठिकाणी केवळ तहसीलदारांना निवेदन दिले जातील असे सांगितले. त्यासोबतच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी पुन्हा एकदा विनंती समीर भुजबळ यांनी केली. या आंदोलनामध्ये मराठवाड्यातल्या वेगळा भागातून ओबीसी समाज सहभागी झाला होता. यापुढील मोर्चे जरी रद्द झाले असले तरी न्यायालयीन लढाई मात्र कायम राहील असेही भुजबळ म्हणाले.


राज्यभर समता परिषदेच्या वतीने आणि ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आंदोलने केली जात होती. आज मात्र हे शेवटचे आंदोलन आहे, कारण कालच राज्याच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा आश्वासन दिलं आहे. त्यामुळे यापुढील ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे रद्द करत असल्याचे देखील समीर भुजबळ यांनी सांगितलं.