अकोला: एका हॉटेलमध्ये हॉलिडे टूर फॅमिली पॅकेजच्या नावाखाली '7 Star Golden Event Management company' या तथाकथित नावाच्या कंपनीने अकोल्यातील नागरिकांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय आणि खदान पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारवरून हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तुम्ही फक्त 75 हजार रुपये भरले की तुम्हाला हॉलिडे टूर'मधील सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन देत तब्बल 35 नागरिकांची फसवणूक झाल्याचे समजते. या प्रकरणी आतापर्यंत दहा तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण? 
मुंबई येथील '7 star Golden Event Management company' या तथाकथित कंपनीचे प्रतिनिधी 7 एप्रिल रोजी अकोल्यात आले. त्या आधीच त्यांनी अकोल्यातील वेगवेगळ्या कार-शोरूम मधून कार खरेदी केलेल्यांची मोबाईल नंबर घेतले. त्यानुसार त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे संदेश सर्वांना पाठवण्यात आले. पुढे 8 एप्रिल रोजी कंपनीकडून हॉलिडे पॅकेजसाठी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन अकोल्यातील एका हॉटेल'मध्ये करण्यात आलं. ज्यामध्ये जवळपास 100 वर लोकांनी उपस्थिती दर्शविली होती. तर अनेक लोकांना फोन करून बोलावले. 


उपस्थितांना मार्गदर्शन करून कंपनीच्या पॅकेजनुसार हॉलिडे टूर पॅकेज बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. 75 हजार रुपयांमध्ये तीन वर्ष, प्रत्येक वर्षी 6 रात्री 7 दिवसांचं भारत आणि परदेशाच्या पॅकेजचं आमिष दिलं गेलं. यामध्ये दोन जेष्ठ आणि दोन मुलांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं गेलं. या पॅकेजमध्ये सहभागी पर्यटकांना विविध भागातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच हॉटेल व रिसॉर्टमध्ये राहण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जर 75 हजार रूपयांतील पन्नास टक्के रक्कम म्हणजे 37,500 रूपये नागरिकांनी भरलेत. 


फसवणूक झाल्याचे असं आलं लक्षात... 
अनेक नागरिकांकडून 37,500 हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला, बुकिंगशी संबंधित प्रमाणपत्र घेतले. मात्र, अनेक दिवस उलटूनही टूरची व्यवस्था करण्यात आली नाही. यावर त्यांनी प्रमाणपत्रावर नमूद मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदर क्रमांक बंद असल्याचे दिसून आले. यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या नागरिकांनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय आणि खदान पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. 


कौलखेड भागातील रहिवासी असलेले प्रा. संजय भगत यांनाही हॉलिडे पॅकेजसाठी आयोजित कार्यक्रमात बोलवण्यात आले. या दरम्यांन त्यांनीही 37,500 हजार रूपये जमा केले. मात्र काही दिवसानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी खदान पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे. जवळपास दहा लोकांनी आतापपर्यंत तक्रारी दिल्या असून आणखी नागरिकांची फसवणूक झाल्याची तक्रारी समोर येण्याची शक्यता आहे.


खदान पोलिसांचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन 
सदर सर्व फसवणुकीच्या तक्रारी घेतल्या असून या संदर्भात चौकशी सुरु असल्याचं खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितले. या प्रकरणाचा लवकर तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या लोकांचाही शोध सुरू आहे. यापुढे नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांनी केले आहे.