अकोला : विदर्भातील महत्वाचा आणि लक्षवेधी विधानसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व. शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र तोंडवळा असलेला हा मतदारसंघ.


जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या 'संवेदनशील' मतदारसंघ अशी या मतदार संघाची ओळख. या मतदारसंघातील राजकीय लढाई नेहमीच अकोला जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवणारी असते. 2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली. मात्र, याच मतदारसंघात ही आपत्ती भाजपसाठी 'इष्टापत्ती' ठरली. युतीत शिवसेनेच्या ताब्यातील या मतदारसंघावर 2014 मध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं. दहा वर्षांपासून भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपनं हिसकावला. आणि गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात भाजपनं चांगली मशागत करीत संघटनात्मक जम बसवला. 2014 च्या निवडणुकीत अत्यल्प मतांनी निवडून आलेल्या आमदार रणधीर सावरकरांनी लोकसभेत पक्षाला 50 हजारांचा 'लीड' येथून मिळवून दिला आहे. आमदार रणधीर सावरकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंचे भाचे. या मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणावर या 'मामा-भाच्या'च्या जोडीनं आपली पक्की मांड बसवली आहे. त्यामुळे 2019 मध्ये या मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे संजय धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशीच होणार आहे.

अकोला पूर्व मतदार संघातील मतदार संख्या(लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीनुसार)

1. एकूण मतदार : 3,37,398

2. पुरुष मतदार : 1,74,330

3. स्त्री मतदार : 1,63,949

अकोला पूर्व. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक राजकीय संवेदनशील आणि घडामोडींचा मतदारसंघ. पूर्वी हा मतदारसंघ 'बोरगावमंजू' या नावाने ओळखला जायचा. मात्र, 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत या मतदारसंघाचे 'अकोला पूर्व' असे 'नामकरण' झाले आहे. हा मतदारसंघ निमशहरी असा आहे. अकोला शहरातील 20 टक्के भागासह संपूर्ण अकोला तालुका मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. सोबतच मुर्तिजापूर आणि अकोट तालुक्याचा काही भागही यात समाविष्ट आहे.

जिल्ह्यातील 'मराठा राजकारणाचे केंद्र' अशी या मतदारसंघाची ओळख आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील विस्ताराने आणि सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे. स्थापनेपासून या मतदारसंघावर 1990 पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, 1990 मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. 1990 पासून आतापर्यंत या मतदारसंघात प्रत्येकी तीनवेळा आलपालटून येथे शिवसेना आणि भारिप-बहूजन महासंघ विजयी झाला आहे. तर 2014 मध्ये पहिल्यांदाच भाजपला येथे संधी मिळाली आहे. पुढच्या प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघानं वेगवेगळ्या पक्षांना संधी दिल्या आहेत.

2014 च्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

1. रणधीर सावरकर : भाजप : 53,678.

2. हरिदास भदे : भारिप-बमसं : 51,238.

3. गोपीकिशन बाजोरिया : शिवसेना : 35,514.

4. डॉ. सुभाषचंद्र कोरपे : काँग्रेस : 9,542.

5. शिरीष धोत्रे : राष्ट्रवादी : 6,088

विजयी मताधिक्य : रणधीर सावरकर, भाजप : 2,440.

या मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात सर्वात प्रबळ ही 'मराठा लॉबी' आहे. मात्र 1999 नंतर या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत मराठा मतांमध्ये मतविभाजन झालं. आणि याचा थेट फायदा भारिप-बहुजन महासंघाला झाला. मराठा मतातील या फुटीचा फायदा घेत भारिप-बहुजन महासंघाने 1999, 2004 आणि 2009 मध्ये येथे विजय मिळविला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत चार मराठा दिग्गज उमेदवार असतांना मराठा समाजानं आपली ताकद भाजपच्या पारड्यात टाकली. अन मतविभाजनातून पराभवाची परंपरा खंडित केली.

आमदार रणधीर सावरकर यांनी गेल्या पाच वर्षांत सभागृह आणि जिल्ह्यात अभ्यासू आमदार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांशी त्यांची खास जवळीक निर्माण झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाकडून रणधीर सावरकर यांच्याशिवाय दुसरा कुणीच दावेदार नाही. याशिवाय लोकसभेत सावरकरांनी संजय धोत्रेंना येथून 1 लाख 12 हजारांवर नतं मिळवून देत जवळपास 50 हजारांची आघाडी मिळवून दिली. या मतदार संघातील ही धोत्रेंना मिळालेली सर्वाधिक आघाडी आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते.

1. संजय धोत्रे : भाजप : 1,11,115

2. प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 61,712

3. हिदायत पटेल : काँग्रेस : 20,867

मताधिक्य : संजय धोत्रे : भाजप : 49,403
युतीमध्ये हा मतदारसंघ 2014 पर्यंत शिवसेनेच्या वाट्याला होता. यावेळीही शिवसेना दबक्या सुरात या मतदारसंघावर दावा करतांना दिसते आहे. मात्र, केंद्र, राज्य आणि जिल्ह्याच्या राजकारणात संजय धोत्रेंचा सध्या असलेला दबदबा बघता भाजप कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नाही. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ येण्याची आस लावून अनेकजण बसले आहेत. यात प्रामुख्याने 2014 मध्ये उमेदवार असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, माजी जिल्हा प्रमुख विजय मालोकार, सेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, 'मातोश्री'ची जवळीक असलेले अॅड. अनिल काळे यांचा समावेश आहे.

या मतदारसंघात वंचित बहूजन आघाडी म्हणजेच आधीच्या भारिप-बहूजन महासंघाचाही मोठा दबदबा आहे. 1999, 2004 आणि 2009 असे तीनदा भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार येथे विजयी झाले आहेत. लोकसभेत आंबेडकरांना येथून 62 हजारांच्या जवळपास मतं मिळालीत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. यावेळी प्रमुख दावेदारांमध्ये पक्षाचे दोनवेळा आमदार राहिलेले हरिदास भदे आणि माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी सभापती शोभा शेळके, डॉ. हर्षवर्धन मालोकार हेही तिकिटाच्या स्पर्धेत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. 1990 पासून येथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नाही. लोकसभेतही काँग्रेसला जेमतेम 21 हजार मतंच येथे मिळाली आहेत. या मतदारसंघात काँग्रेस पक्ष जवळपास मृतप्राय झाल्याच्या अवस्थेत आहे. मात्र, काँग्रेसच्या इच्छुकांची संख्या येथे मोठी आहे. प्रमुख दावेदारांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख आणि दादाराव मते, जेष्ठ काँग्रेसनेते रमेशमामा म्हैसने, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय डॉ. पुरुषोत्तम दातकर यांचा समावेश आहे.
हा मतदारसंघ कायम विकासापासून कोसो दूर राहिलेला. मात्र, गेल्या पाच वर्षांत येथील रस्ते आणि खारपाण पट्ट्याच्या विकासासाठी काही ठोस पावलं उचलण्यात आलीत.

मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्त्याचं जाळं मजबूत करण्याचे प्रयत्न केले गेलेत. मात्र, हे काम पूर्णत्वास न गेल्यानं जनतेत काही प्रमाणात नाराजी आहे. या मतदार संघातील शेती पूर्णत: खारपाण पट्ट्यातील. जमिनीत क्षारांचं अतिप्रमाण असल्यानं शेतकर्यांना पूर्णपणे पावसावर अवलंबून रहावं लागतं. सावरकर यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारने राज्यातील खारपाण पट्ट्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. या भागासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं 4 हजार कोटींचा एक पथदर्शी प्रकल्प 'नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पा' अंतर्गत सुरु केला. सोबतच निधीमुळे रखडलेल्या नेर-धामणा बॅरेजच्या कामाला मोठी गती देण्यात आली. या मतदारसंघाची भाग्यरेखा बदलू पाहणाऱ्या या प्रकल्पातून 2020 मध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी नसल्यानं बेरोजगारांचे लोंढे मोठ्या शहरांकडे वळत आहेत.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

1. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था.

2.खारपाणपट्ट्याची समस्या,

3. सिंचनाचा अभाव.

4. औद्योगिक वसाहतीची दुरवस्था, त्यामुळे नवे उद्योग नाहीय.

5. विमानतळ विस्तारीकरण

6. रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध नाहीय.

विकासाला सर्वाधिक वाव असलेला हा मतदारसंघ. मात्र, स्थापनेपासूनच हा मतदारसंघ जातीय समीकरणाच्या चक्रव्युहात अडकला आहे. काळाची पावलं ओळखत हा मतदारसंघ विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार का?. हा मतदारसंघ केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची प्रतिष्ठा राखणार का?. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी 2014 च्या पराभवाची कोंडी फोडणार का?, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही निवडणूक असणार आहे. निवडणुकीचं घोडामैदान जवळच आहे. त्यामुळे पुढच्या काळात येथील राजकारणात कोणते रंग भरले जातात, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.