नाशिक : साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता नवं राहिलेलं नाही. नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan देखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. साहित्य संमेलन आता पुन्हा वादात सापडले आहे. अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगायला सुरवात झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट


साहित्य संमेलन एकतर्फी होत आहे. संमेलनात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न देता जाणुन बुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला आहे. भाजपच्या तिन्ही आमदारांनी 10/10 लाखांचा निधी दिला,महापालिकाने 25 लाख निधी देऊनही भाजपच्या नेत्यांना स्थान नसल्याने आयोजकांचे चांगलेच कान टोचले आहेत. 


महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, साहित्य संमेलनात साहित्यिकांचा सन्मान राखला जावा. संमेलन सर्व समावेशक असावे एकतर्फी असू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. ग्रंथ दिंडी नशिकमध्ये निघणार असल्याने केवळ ग्रंथ दिंडीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या आधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला आहे. 


संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट


94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 


94 व्या साहित्य संमेलनादरम्यान पाळावे लागणार 'हे' नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या  50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
 
ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता सहभाग
साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविकट्टा, कविसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद , बालसाहित्य मेळावा, आणि संस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम संमेलनाच्या अधिकृत सोशल मीडिया पेज , युट्यूब चॅनल आणि वेबसाईट वर लाईव्ह बघायला मिळणार आहेत. यामुळे घरी बसल्या संमेलनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.


प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्यसंमेलनाचे उद्धाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर  उपस्थिती लावणार आहेत. तसेच संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. खगोल शास्त्रज्ञ विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.