बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे भाषण काही वेळा अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदाची खाण असते. भाषणात बोलता-बोलता अजित पवार अनेकांची फिरकी घेतात. त्यामुळे सहाजिकच विनोद निर्माण होतो. तर कधी कधी मिश्किलपणे ते एखाद्याची कानउघाडणी देखील करतात. सहकार व पणन मंडळाच्या बारामतीतील कार्यक्रमात असाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्किलपणा दिसून आला. 


कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याच वेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठाय. तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दात कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशा देखील पिकला. 


अजित पवार यावेळी म्हणाले की, गेली पंधरा वर्षे राज्यात आघाडीचे सरकार होतं त्यावेळी सहकार मंत्री पदे काँग्रेस होतं पण आता यावेळी सहकार मंत्री पद हे आम्ही राष्ट्रवादीकडे ठेवायचं ठरवलं. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना देशात अव्वल ठरला आहे. त्यांच्याकडे सध्या 20 लाख साखर पोत्यांचा साठा आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. आता त्यांची चांदीच आहे. त्यामुळे विचार करा या कारखान्याला किती फायदा होणार आहे. आपल्या तिन्ही साखर कारखान्याचे चेअरमन यांनी पहा जरा कारखान्याचे काम कशापद्धतीने केले जाते. सहकारमंत्र्यांचा कारखाना एकखांबी आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. कारखान्याची निवडणूक सुद्धा बिनविरोध केली जाते, असं ते म्हणाले.


ते म्हणाले की, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधानसभेचे तिकीट एका निवडणुकीमध्ये पक्षाने कापले. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरी केली. आम्ही सुद्धा त्यांना ‘करा’ असे म्हणालो. त्यानंतर बाळासाहेब 43 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झाले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बाळासाहेब दैवत मानत असल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही. यावर देखील जोरदार हशा पिकला.