अहमदनगर : भाजपचं धोरण शेतकऱ्यांना मातीत घालणारं आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच  शेतकऱ्यांची वीज तोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पवारांनी दिला आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमधील शेतकरी आंदोलन शांत झालं आहे. त्यानंतर आज अजित पवार यांनी आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. सकाळी लवकरच अजित पवार नगरमध्ये आले आणि त्यांनी जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली.

शेतकरी आंदोलनात जखमी झालेले दोन्ही शेतकरी पैठण तालुक्यातील आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध कऱण्यासाठी आज पैठण बंदची हाक अनेक संघटनांकडून देण्यात आली होती. तर सुकाणू समितीच्या वतीनंही आज शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान कृषीपंपांचं थकित वीजबील भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ ऊर्जा विभागाकडून देण्यात आली आहे. आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज खंडित होणार नसल्याचं राज्याच्या ऊर्जा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.