शिर्डी : “शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे राबविणारेच देशद्रोही आहेत. शिवाय, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याऐवजी ब्रिटिशांची भलावण करणाऱ्या संघटनांना गुरुस्थानी मानणाऱ्यांनी शेतकऱ्यांना देशभक्ती शिकवू नये.”, असा पलटवार डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. डॉ. नवले हे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे समन्वयक आहेत.


मुख्यमंत्र्यांचा आजचा त्रागा अनाठायी आहे. त्रागा केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी धोरणे बदलावी लागतील, असेही डॉ. अजित नवले म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी अराजक पसरवणारी असेल, तर विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री अशी मागणी करुन अराजकच पसरवत होते काय?, असा सवाल डॉ. अजित नवले यांनी केला.

शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी म्हणजे देशद्रोह व अराजक आणि कॉर्पोरेट कंपन्यांची करमाफी, कर्जमाफी म्हणजे देशप्रेम व सुशासन हा कुठला न्याय?, असा संतप्त सवालही डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.

“खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा म्हणून अटी-शर्ती असतील व त्यामुळे नियमित कर्ज भरणारे, सावकारांकडून, पतसंस्थांकडून कर्ज घेणारे, सिंचन, पॉलीहाउस व शेडनेट साठी कर्ज घेणारे वंचित राहणार असल्याने खरे शेतकरी ठरणार नसतील तर मग खरे शेतकरी नागपूरच्या रेशीम बागेत शोधायचे का?”, असेही डॉ. नवले यांनी विचारले.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

शेतकऱ्यांची आंदोलनं आणि सुकाणू समितीवरही मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. पालकमंत्र्यांना ध्वज फडकवू न देणारेही देशद्रोहीच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता गेली तरी चालेल, पण आम्हाला ज्या व्यक्ती देशाचा झेंडा फडकवण्यापासून रोखेल. त्याला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.