विधानसभेसाठी जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष चिंतेत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 19 Aug 2019 08:28 PM (IST)
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी घ्याव्या लागणाऱ्या सभा, त्याचं नियोजन सुरु करावे लागणार असल्यामुळे जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत तोडगा निघत नसल्याने चिंता वाढत असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. राज्यातील विधानसभेच्या 76 जागांची मागणी एमआयएमकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप जागावाटपाबद्दल कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. याबाबत बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, "दिल्लीमध्ये यासंबंधी बैठक झाली होती. ज्यामध्ये असदुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर आणि मीही उपस्थित होतो. त्या मिटिंगमध्ये एमआयएम कोणत्या जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत त्याची यादी प्रकाश आंबेडकर यांनी मागितली होती. त्यावेळी 98 जागांचा प्रस्ताव राज्यभरातील आमच्या जिल्हाध्यक्षांकडून आला होता. त्यात आम्ही सर्वेक्षण केले. त्यातील 76 जागा अशा होत्या की ज्या ठिकाणी एमआयएमचं प्राबल्य आहे. 22 जागा अशा होत्या की ज्यामध्ये अधिक कष्ट करण्याची गरज होती आणि या सगळ्या जागांवर सर्व्हे केला. त्यामुळे आम्ही 76 जागांची यादी वंचित बहुजन आघाडीकडे पाठवली". या बैठकीला 15 दिवस उलटलेले आहेत. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कमिटीसमोर बसून निर्णय घेण्याचे एमआयएमला सांगितले होते. 3 दिवसांत यादी पाठवू असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता 15 दिवस उलटूनही यादी आलेली नाही. "त्यामुळे खूप उशीर झाला म्हणून आम्हाला काळजी वाटते. ज्या जागांवर काही आक्षेप, समस्या नाही त्या जागा सांगा त्या जागांवर आम्ही काम सुरु करू अशी विनती आम्ही केली. पण तसंही झालं नाही. त्यामुळे आम्ही आता पुन्हा विनंती केली आहे. आम्ही 76 जागांवर ठाम आहोत असं काही नाही. बाळासाहेब यांनी जर सांगितले की या जागा आम्ही नाही देऊ शकत तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत. मात्र निर्णय लवकर घेण्यात यावा.", असे जलील म्हणाले. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी घ्याव्या लागणाऱ्या सभा, त्याचं नियोजन सुरु करावे लागणार असल्यामुळे जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.