Wet drought : यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची (Rain) नोंद झाली आहे. राज्याील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेलीत. अशा स्थितीत राज्यात ओला दुष्काळ (Wet drought) जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. त्याचबरोबर विविध शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नसल्याचं म्हटलंय. त्यामुळं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यावरुन 'सामना' रंगलाय. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष नेमके काय? ओला दुष्काळ म्हणजे काय? याबाबत एबीपी माझानं (Abp Majha) काही कृषी अभ्यासकांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
 
यावर्षी सुरुवातील जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला, याचा मोठा फटका शेती पिकांना बसला. त्यानंतर या चालू ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानं राज्यात थैमान घातलं. त्यामध्ये उरली सुरली पिकं वाया गेली. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही. त्यामुळं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जातेय. याबाबत किसान सभेचे नेते आणि कृषी अभ्यास डॉ. अजित नवले (Dr.Ajit Nawale ) यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडलेत.


अवकर्षण काळ आणि अतिवृष्टी


ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दप्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याची माहिती किसान सभेचे नेते आणि कृषी अभ्यासक डॉ. अजित नवले यांनी दिली. सरकारी दप्तरात दोन शब्द वापरले जातात. यामध्ये पहिला अवकर्षण काळ. यामध्ये सरासरीपेक्षा 10 टक्के पाऊस जर कमी झाला तर त्याला अवकर्षण काळ असं म्हटलं जाते. जर सरासरीपेक्षा 10 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी आहे असं म्हटलं जातं.


ओल्या दुष्काळामध्ये नेमकं काय होतं? 


सरकारी दप्तरात ओला दुष्काळ अशी कोणती संकल्पना नाही. ओल्या दुष्काळात खरीपाची पिकं नष्ठ होतात. शेतकऱ्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर शेत जमिनी खरवडून जाते, अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते, त्याला आपण ओला दुष्काळ म्हणतो. खरतर हा उत्पादनाचा दुष्काळ असतो असे अजित नवले यावेळी म्हणाले. या काळात उत्पादन संपलेलं असतं त्यालाचा आपण ओला दुष्काळ म्हणतो. त्याला आपण पाण्याच्या निकषामध्ये मोजत नाही. यामध्ये निकष हा नुकसानीचा असतो असते अजित नवले म्हणाले. अशा स्थितीत परिस्थिती सांगत असते की, शेतीमालाचं नुकसान झालं आहे, त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करा. 


उत्पादन नष्ट होणं म्हणजेच ओला दुष्काळ


अवेळी जो पाऊस येतो, तो जरी सरासरीपेक्षा कमी असला तरी त्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होतं. किती पाऊस पडला हे महत्वाचं नसतं तर तयार असलेली पिकं या पावसामुळं बर्बाद होतात. त्यामुळं पाऊस किती झाला हे महत्वाचं नाही तर यामुळं आमचं नुकसान किती झालं हे महत्वाचं असल्याचे अजित नवलेंनी यावेळी सांगितलं. अवेळी पाऊस येण हिच आपत्ती असल्याचे नवले म्हणाले. शेती उत्पादन नष्ट होणं म्हणजेच ओला दुष्काळ असल्याचे अजित नवले म्हणाले. संपूर्ण खरीप हंगामाकडं नजर टाकल्यावर आपल्याला समजेल शेतकऱ्यांची पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं संपूर्ण खरीप हंगामाचा सरकारनं आढावा घ्यावा असेही नवले म्हणाले. मात्र, सध्या सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अजित नवलेंनी केली.




यावर्षी ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती कारण.... : विजय जावंधिया 


दरम्यान, ओला दुष्काळाच्या मुद्यासंदर्भात एबीपी माझाने कृषी अभ्यासक विजय जावंधिया (vijay jawandhiya) यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी देखील याबाबत माहिती दिली. दुष्काळ जाहीर करायचा असेल तर पहिल्या काळात पिकांची आनेवारी काढली जायची. 50 टक्क्यांपेक्षा कमी जर उत्पादन हाती येत असेल तर दुष्काळ जाहीर केला जायचा अशी माहिती विजय जावंधिया यांनी दिली. मग ओला दुष्काळ असो किंवा कोरडा दुष्काळ असो. यावर्षीचा जर विचार केला तर पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती असल्याची माहिती जावंधिया यांनी दिली. सध्या 50 टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आहे. तसेच पावसामुलं यंदा शेतीत खर्च खूप झाला आहे. तसेच उत्पादन देखील कमी येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला दर देखील कमीच येणार असल्याचे जावंधिया यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात दोन वेळा दुष्काळ जाहीर केल्याची माहिती देखील यावेळी जावंधिया यांनी दिली. 


यावेळी बोलताना विजय जावंधिया यांनी दोन उदाहरणे देखील दिली. कापसाला असणारा 12 ते 13 हजार रुपयांचा दर सध्या 7 आणि 8 हजार रुपयांवर आला आहे. दुसरीकडं 7 ते 8 हजाराने विकणारं सोयाबीन आता 4 हजारावर आलं असल्याचे विजय जावंधिया म्हणाले. ही परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखीचं असल्याचे त्यांनी सांगितले. 


दुष्काळ जाहीर केल्यावर नेमकं काय होतं?


दुष्काळ जाहीर केल्यावर पहिलं शेतकऱ्यांकडून होणारी कर्जवसुली थांबते. तसेच नवीन कर्जाचं पुरर्गठन होतं. शेतकऱ्यांनी नवीन कर्ज उपलब्ध होतं. त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो असे जावंधिया म्हणाले. तसेच दुष्काळ जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांची फी माफ होते. तसेच सरकारची सगळी वसुली थांबते. त्यामुळं सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखीचं स्थिती असून तो जाहीर करण्याची मागणी योग्यच असल्याचे जावंधिया म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Shetkari Sanghatana : ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम, सहभागी होण्याचं आवाहन