नागपूर : इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वर्षावरुन पाच वर्ष करणार नाही, असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. विधानपरिषदेत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रश्नावर उत्तर देताना तावडे यांनी सरकारची भूमिका मांडली.


"देशातील इतर बहुतांश राज्यात पहिली इयत्तेच्या प्रवेशाचं वय पाच वर्ष आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या राज्यातही पहिली प्रवेशाचं वय पाच वर्ष करावं," अशी मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली होती.

"सुरुवातीची काही वर्षे मुलं कुटुंबासोबत राहणं गरजेचं असतं. पण याच काळात मुलांना सहा-सहा तास बाहेर का ठेवायचं," असा सवाल तावडेंनी विचारला. "आपण पहिली प्रवेशाचं वय जर 5 वर्ष केल तर सीनिअर केजी, ज्युनियर केजीचं वय कमी होईल आणि पालक वयाच्या दुसऱ्या वर्षीच मुलांना नर्सरीत टाकतील. आपल्याला मुलांचं बालपण हरवण्याची इतकी घाई का झाली आहे," असंही तावडे म्हणाले.

तसंच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 1 लाख मुलांसाठी 14 लाख मुलांचं भवितव्य का धोक्यात घालायचं, असं म्हणत पहिलीचं वय 6 वर्ष केल्यामुळे स्पर्धा परीक्षेत नुकसान होत असल्याचा दावा विनोद तावडेंनी फेटाळला. "तसंच बाकीच्या राज्यांनी पहिली प्रवेशाचं वय पाच वर्ष करुन कायदा मोडला, म्हणून आपण ते करणार नाही," असं तावडेंनी स्पष्ट केलं.

पाहा व्हिडीओ