मुंबई : 'राजू शेट्टी हे स्वयंभू नेते आहेत. संघटनेत कुणाला ठेवावं आणि कुणाला नाही, याचा निर्णय तेच घेऊ शकतात,' अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेत त्यांनी राजू शेट्टींना लक्ष केलं.


सदाभाऊ म्हणाले की, ''ज्या चळवळीमध्ये मी खऱ्या अर्थानं जीव ओतून काम केलं, रक्ताचं पाणी करुन वाढवली. त्या संघटनेतून हकालपट्टीचं वृत्त ऐकून अतिशय दु:ख होत आहे. पण हा संघटनेच्या नेतृत्वाच्या मनात जे आहे, त्याबाजूनंच सर्व काही घडत आहे. त्यांना यातून आनंद मिळत असेल, तर त्यांनी तो जरुर घ्यावा,'' अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

मंत्रीपद सोडण्यासंदर्भात सदाभाऊ म्हणाले की, ''संघटनेनं आपला निर्णय घेतलेला आहे. पण मंत्रिपदाबद्दल मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाला निर्णय घ्यायचा आहे. ते जो निर्णय सांगतिल तो मला मान्य असेल,''

भाजपत प्रवेश करणार का? या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, ''याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल. सध्यातरी यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही,'' असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.

“सदाभाऊ यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित झाली आहे. शिवाय, त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे.”, असे दशरथ सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या

शेतकरी नेत्यांची जोडी फुटली, सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी