मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनंट मुख्यमंत्री मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु आता शपथ आघाडीच्या शपथविधी सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आमदारांनी घेतलेली शपथ ही नियमबाह्य असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिकेद्वारे शपथविधी रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.


चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन सरकारने शपथविधी घेतल्यापासून विधान मंडळाचे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. जर राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्याचसोबत जर राज्यपालांनी ही याचिका स्वीकारली तर सरकारने या 2 दिवसांत घेतलेले निर्णय रद्द होतील असंही ते म्हणाले.

राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांना बदलता येत नाही. परंतु नव्या सराकरनं कालिदास कोळंबकर यांना हटवून त्यांच्या जागी वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असं पहिल्यांदाच घडत असल्याचं पाटील म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानं न करता उघडपणे होत आहे. ही नियमांची पायमल्ली असल्याचं त्यांनी सांगितलं.

170 वर विश्वास असेल तर गुप्तमतदान घ्या,घाबरत कशाला? असा सवाल देखील पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. शपथविधी झाला आता सोडून द्या आमदारांना का त्यांना हॉटेलमध्ये बंद करुन ठेवले आहे. मारून मुटकून सरकार चालवता येणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

chandrakant Patil | नव्या सरकारकडून विधानसभेचे नियम धाब्यावर बसवलेत : चंद्रकांत पाटील | ABP Majha