मुंबई : दारु कंपन्यांना देण्यात येणार पाणीबंदीबाबत येत्या 5 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा ज्या दारु कंपन्यांना पाणी जातं, तिथल्या पाईप फोडून टाकू, असा थेट इशारा काँग्रेसने दिला आहे.   'एबीपी माझा'च्या 'माझा विशेष' या कार्यक्रमांतर्गत "टंचाईमुळे दारु उद्योगांचं पाणी का थांबवू नये?" या विषयावर चर्चा सुरु होती. याबाबत बोलताना काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी सरकारला हा थेट इशारा दिला.   राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. लातुरसारख्या शहराला तर रेल्वेने पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दारु कंपन्यांना देण्यात येणारा पाणी पुरवठा रोखण्यात यावा, अशी मागणी होत आहे.   हीच मागणी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी 'माझा विशेष' कार्यक्रमात मांडली.   "दारु कंपन्यांना देण्यात येणारा पाणी पुरवठा थांबवला नाही, तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. येत्या 5 दिवसाच्या आत सरकारने हा निर्णय घ्यावा. अन्यथा ज्या ज्या ठिकाणी पाणी जातं, त्या ठिकाणच्या पाईप फोडून टाकू, गुन्हे दाखल झाले तरी चालतील" असा इशारा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला.   जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश दरम्यान, मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरु असताना दारु कारखान्यांसाठी होत असलेल्या भरमसाठ पाणी पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत.   दारु कंपन्यासाठी कोट्यवधी लिटर पाणी   औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यात असलेल्या दारु कारखान्यांसाठी कोट्यवधी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जोवर पाऊस पडत नाही तोवर हा पाणीपुरवठा बंद केल्यास शेकडो गावं, वाड्यावस्त्यांची तहान भागेल असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे.   एका वर्षात मराठवाड्यात 27 कोटी लीटर बीअरचं उत्पादन होतं. एका लीटर बीअरसाठी 4 लिटर पाणी लागतं. आणि ही चैन दुष्काळात परवडण्यासारखी नाही. त्यामुळं सध्या दारुकंपन्यांना होत असलेला पाणीपुरवठा तातडीनं बंद करण्याची मागणी जोर धरतेय.

संबंधित बातम्या

'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा'

मराठवाड्यात 27 कोटी लिटर दारुसाठी 104 कोटी लीटर पाणी

लोकांना ३ दिवसाआड पाणी, दारु कंपन्यांना २४ तास

4 हजार कोटी महसुलावर पाणी, बिहारमध्ये दारुबंदी