Shiv Sena Symbol Issue Election Commission :  केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाणावर सुरु असलेली सुनावणी 30 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.  30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.  आज ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. आयोगातील सुनावणीनंतर दोन्ही गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणालेत. 


आदित्य ठाकरे काय म्हणाले?
तारीख पे तारीख सुरूच राहणार आहे. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यांची कागदपत्रे तपासणी करणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जरी दिली असली तरी त्याची सत्यता निवडणूक आयोगाने तपासावी, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या पद्धतीने कागदपत्रांचा विषय आहे, अशाच प्रकारे पदाधिकारी निवडूनचा देखील विषय आहे. आम्हाला आशा आहे सत्याचा विजय होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 



शिंदे गटाचे राहुल शेवाळे काय म्हणाले?


आज दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद झाला. लेखी उत्तर देण्यासाठी 30 तारीख दिली आहे. तीन महत्वाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगल. 
आयोगानं दोन्हीकडील म्हणनं एकून घेतलं आहे. लेखी उत्तरानंतर यावर निर्णय होईल, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले. 


बाळासाहेबांनी तयार केलेल्या शिवसनेच्या घटनेनुसारच आम्ही सगळे केलं आहे. आज यावर युक्तीवाद झाला. उद्धव ठाकरे यांनी घटना बदलली, ते बेकायदा आहेत.
निवडणूकीत जी मते पडतात त्यावरून पक्ष ठरतो. त्यामुळे आमदार खासदारांचं महत्त्व आहे, असे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.  


अनिल परब काय म्हणाले?


शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे खोडून काढायचे होते.  ते देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी खोडून काढले आहेत. आज दोन्ही वकिलांनी सविस्तर खुलासा केला. सादिक अली केसबाबत स्पष्ट भुमिका घेतली. येथे तशी परिस्थीती नाही, पक्ष जसा आहे तसा मजबूत आहे, असे अनिल परब म्हणाले. 


शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्द्यामध्ये त्रुटी होत्या. राष्ट्रीय कार्यकारणी झाल्यापासून कुठलाही वाद दाखवला नव्हता. बैठकांनंतर त्यांनी या नेमनुका केल्या होत्या. सगळा विचार करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळं धनुष्यबान आम्हालाच मिळेल, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला. युक्तीवाद पुर्ण झालाय. ते आमचे पक्षप्रमुख आहेत हे सगळ्यांना माहित आहेच. शिवसेनेच्या पक्षनेते हे पदच नाहीये. शिवसेना पक्षप्रमुख हे पद आहे. आमच्या घटनेत विभागप्रमुख हे मुंबईचे आहेत, असेही अनिल परब म्हणाले.