बीड : प्रवास कोणत्याही वाहनाचा असो, प्रत्येकाला खिडकीतली जागा हवी असते. खिडकीतली जागा मिळाली की हात आपोआप बाहेर जातो. मात्र हात बाहेर काढणं जीवावर कसं बेतू शकतं, याची घटना बीडमध्ये घडली आहे.


एका क्षणात हात धडावेगळा

अर्जुन डोरलीकर यांचे कुटुंबीय अंबाजोगाईहून उस्मानाबादकडे जात होते. लग्नाची सोयरीक जमायला डोरलीकर कुटुंबीयांना उस्मानाबादकडे निघायला रात्रीचे आठ वाजले. सुमो गाडी लोखंडी सावरगाव जवळच्या लातूर टी पॉईंटवर आली. अर्जुन डोरलीकर हे चालकाच्या पाठीमागे खिडकीला बसले होते. गरमी होत असल्याने त्यांचा हात खिडकीवर होता. तेवढ्यातच समोरुन येणाऱ्या भरधाव गाडीने त्यांचा हात असा ओढत नेला, की तो कधी धडा वेगळा झाला कळलंही नाही.

डोरलीकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि नातेवाईक याच गाडीतून प्रवास करत होते. घटना घडल्यावर त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळ असल्याने वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. त्यानंतर डोरलीकर यांना लगेच अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अगदी 20 मिनिटात अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात पोहोचवलं आणि वेळेत उपचार मिळाले.

वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं

सध्या राज्यभर रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूचा रस्ता खोदण्यात आल्यानंतर वाहतूक एकाच बाजूने चालू असते. हीच एकेरी वाहतूक धोकादायक ठरत आहे.

वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी गाडी थांबवताना आणि वळवताना हात बाहेर न काढता इंडिकेटरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. वाहतुकीच्या नियमाचे फलक आपण नेहमी वाचतो. मात्र त्याचं पालन होताना दिसत नाही.

खिडकीतून हात बाहेर काढणे, गाडी वेगाने चालवणे या जुजबी वाटणाऱ्या गोष्टी... पण याच छोट्या-छोट्या चुका कशा जीवावर बेतू शकतात, हे बीडमधील घटनेतून समोर आलं आहे. त्यामुळे प्रवास करताना आपला जीव हेच प्रत्येकाचं प्राधान्य हवं, ज्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जाईल आणि अशा घटना टळतील.