गडचिरोली : वाढत्या नक्षली कारवायांवर आळा घालण्यासाठी, तसेच पोलिस विभागाचे गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह विभागाने गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात नवीन 90 दूरसंचार टॉवरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. यासाठी गृह विभागाकडून 28 कोटी 80 लाखांच्या निधीला मंजुरीही देण्यात आली आहे.


मागास आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक दशकापासून नक्षलवादामुळे जिल्ह्याचा विकास थांबला आहे. कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस नक्षल समस्या वाढतच जात आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यात दूरसंचार सेवा अधिक मजबूत करण्याचे ठरविले आहे.

नक्षल प्रभावित भागातील पहिल्या टप्प्यात 50 गावांमध्ये दूरसंचार टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 40 टॉवरसाठी 28 कोटी 80 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

यामध्ये कोरची तहसीलमध्ये 4, धानोरा 4, चामोर्शी 1, एटापल्ली 15, भामरागड 5, सिरोंचा 4, अहेरी 5 आणि कुरखेडा तालुक्यात 1 दूरसंचार टॉवर लावण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या जिल्ह्यात दूरसंचाराचे जाळे पसरविण्याचा निर्णयाने नक्षलवाद संपवण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत पोलिसांना तात्काळ मदत तर मिळणारच आहे, याचसोबत जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिक शहराशी जोडले जातील.