8th Shetkari Sahitya Sammelan : यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे 27 फेब्रुवारी 2022 रोजी आठवं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. शेतीविषयाच्या सखोल अभ्यासक आणि स्तंभलेखिका प्रज्ञा बापट आठव्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली आहे.


कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्‍या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र आणि नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे रविवार, दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी 8 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली आहे. 




यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथून 2 कि.मी अंतरावर असलेल्या रावेरी या छोट्याशा खेड्यात सोबत राम नसलेल्या एकट्या भुमीकन्या सीतामाईचे मंदीर आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. स्रीत्वाचे आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी पावनभूमी म्हणून देशातील एकमेव असलेल्या या सीतामंदीराचे आगळेवेगळे स्थान आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते, असा पौराणिक इतिहास आहे. 


शेतीविषयाच्या सखोल अभ्यासक आणि स्तंभलेखिका प्रज्ञा बापट आठव्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविणार असून युगात्मा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना ट्रस्टचे ट्रस्टी संजय पानसे संमेलनाचे उद्गाटन करणार आहेत. संमेलनाच्या आयोजनाकरिता अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे आणि संयोजक बाळासाहेब देशमुख यांनी कार्यभार स्विकारला असून संमेलनाच्या यशस्वीतेकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. जयंत बापट, राजू झोटिंग, इंदरचंद बैद, वामनराव तेलंगे, नामदेवराव काकडे, राजेंद्र तेलंगे, विक्रम फटिंग यांचा प्रामुख्याने समित्यांमध्ये समावेश आहे.


मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी धारण केलेले विक्राळरूप, कोरोना संकटामुळे डबघाईस आलेले शेतीचे अर्थशास्त्र, मागील चार वर्षांपासून सततची नापिकी, कधी चक्रभुंगा तर कधी बोंडसड, कधी कपाशीवर बोंडअळी तर कधी तुरीवर मर रोग यामुळे शेतीतील उत्पन्नासोबतच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे, विजेचे बिल देखील भरण्याची शेतकऱ्यांची उरलेली नाही. अशा बिकट स्थितीतही  "रोजचेच मढे, त्याला कोण रडे" अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे, त्यामुळे प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना शोधण्याऐवजी सक्तीने आणि बळाचा वापर करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीमगर्जना केल्या जात आहेत.


समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या 15-20 वर्षांमध्ये देशात लक्षावधी  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले नाही. शेतीच्या वास्तवतेवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतीच्या दुर्दशेच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.


8 व्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा