मुंबई : संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाची दारं झिजवूनही दाद मिळत नसल्याने हतबल झालेल्या 80 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील असं या आजोबांचं नावं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.


धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

सेंट जॉर्ज रुग्णालयात धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. उपचार घेत असलेल्या धर्मा पाटील यांना धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वगळता कुणीही भेटण्यासाठी गेलेलं नाही, किंवा त्यांची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या नातलगांनी केला आहे.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला.