उस्मानाबाद: गेल्या वर्षी राज्य सरकारने खरेदी केलेली 95 टक्के म्हणजे 68 लाख क्विंटल तूर अजूनही गोदामात पडून आहे. या तुरीचे बाजारभाव तीन हजार कोटी रुपये होईल.


या तुरीवर कोणतीही प्रक्रिया होऊन डाळ तयार झालेली नाही. पण राज्य सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना गेली पाच महिने तूर मिळत असल्याची पावती येत आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झालेला प्रकार आजतागायत सुरु आहे. रेशनच्या दुकानातून कोणत्याही ग्राहकांना काहीही धान्य खरेदी केलं, की त्यासोबत तूरही मिळाल्याची पावती येते. प्रत्यक्षात त्या ग्राहकाला तूर मिळालेलीच नसते.

अधिक चौकशी केली असता, रेशन धान्य दुकानदारांनी गेली पाच महिने हा प्रकार आम्ही अधिकाऱयांच्या लक्षात आणून दिल्याचं सांगितलं.

पण सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ असल्यामुळे, तूर विकल्याच्या पावती येत असल्याचे अधिकारी सांगतात.

सॉफ्टवेअरमध्ये पाच महिने हा गोंधळ होता की आणखी काही यामागे आहे, हा प्रश्न आहे.