एसटी महामंडळाची दिवाळी भेट, दररोज जादा 500 बसेस
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 10:09 AM (IST)
मुंबई : एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खुशखबर आहे. एसटीने दररोज 500 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबरपासून दररोज 500 अतिरिक्त एसटी बसेस सोडणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. या जादा बसेस प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथून सुटतील. खासगी वाहतुकीचे ऐन सणासुदीत वाढलेले तिकीट दर, मनमानी कारभार आणि असुरक्षित वाहतूक यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 1300 बसेस पूर्णपणे आरक्षित झाल्या असून 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता महामंडळानं वर्तवली आहे. एक नोव्हेंबरला असलेल्या भाऊबीजेच्या दिवशी अधिक गर्दीच्या शक्यतेने प्रत्येक आगारातून अधिक बसेस सोडण्यात येतील.