On This Day In History : आजच्या दिवशी म्हणजे चार डिसेंबर रोजी देश विदेशात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या. यापैकी सर्वात महत्वाची घटना म्हणजे सती प्रथेवर बंदी घालण्याची होय... आजच्या दिवशी ब्रिटिश व्हाइसरॉय विल्यम बेंटिक यांनी भारतामध्ये सती प्रथेवर बंदी घातली होती. त्याशिवाय आजच्या दिवशी 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामध्ये नौदलानं महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच आजचा दिवस भारतामध्ये नौदल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
नौदल दिवस - आजचा दिवस भारतामध्ये नौदल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 1971 च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानला धूळ चारली होती, याच विजयाच्या स्मरणार्थ देशभरात चार डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय सेनेच्या एअरस्पेसवर 3 डिसेंबर 1971 च्या दिवशी पाकिस्तानच्या लष्कराने हल्ला केला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतरच 1971 सालच्या युध्दाला सुरुवात झाली. पाकिस्तानच्या या आगळीकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानं ऑपरेशन त्रिशूल (ट्रायडन्ट) सुरु केलं. ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय असलेल्या कराची बेसला लक्ष करण्यात आलं. भारतीय नौदलानं 4 डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचं नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानची भारतावर बॉम्ब वर्षाव करण्याची क्षमता कमी झाली. त्यात भारताच्या नौदलाच्या वतीनं पहिल्यांदाच अॅन्टी शीप मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या या प्रखर हल्ल्यात पाकिस्तानच्या नौदलाचं आणि कराची बंदराचं अतोनात नुकसान झालं. या दरम्यान पाकिस्तानच्या तेलाच्या टॅन्करनाही लक्ष करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या या अफाट कामगिरीमुळं पाकिस्तानच्या नौदलाचं तसंच हवाई दलाचं कंबरडं मोडलं होतं.
सती प्रथेवर बंदी -पतीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने पतीच्या चितेत उडी मारावी, अशी सती प्रथा भारतात कित्येक दिवस चालत होती. भारतातील या कूप्रथेला संपवण्याचे श्रेय ब्रिटिश व्हाइसरॉय विल्यम बेंटिक यांना जाते. आजच्याच दिवशी चार डिसेंबर 1829 रोजी बेंटिक यांनी सती प्रथेवर बंदी घातली होती. भारतातील सर्व वाईट गोष्टींच्या विरोधात ब्रिटिश व्हाइसरॉय विल्यम बेंटिक यांनी लढा दिला होता. बेंटिक यांनी बालिका हत्या करण्याची भारतातील प्रथाही संपवली होती.
विदेशातून डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीयआजच्या दिवशी 1860 रोजी गोव्यातील मारगाव येथील रहिवासी असलेल्या अगस्टिनो लॉरेन्सो यांनी पॅरिस विद्यापीठातून रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी घेतली. विदेशातील विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते.
गेट वे ऑफ इंडियाचं उद्घाटन - मुंबईची शान, देशाचा महत्वाचा लँडमार्क आणि भारताच्या इतिहासाचा एक भाग असलेले गेट वे ऑफ इंडियाला पाहण्यासाठी दररोज हजारो लोक येतात. मुंबईला आलेला प्रत्येकजण गेट वे ऑफ इंडियाला भेट देतोच. गेट वे ऑफ इंडिया पाहिल्याशिवाय मुंबई दर्शन पूर्ण होत नाही. आजच्याच दिवशी 1924 मध्ये गेट ऑफ इंडियाचं उद्घाटन झालं होतं. इंग्रजांच्या काळात 1911 मध्ये या जागेची पायाभरणी करण्यात आली होती. पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारत भेटीवर येणार होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांची आठवण म्हणून गेट ने ऑफ इंडिया तयार करण्यात आले. जॉर्ज विटेट यांनी या गेटचे डिझाईन बनविले होते.
शशी कपूर यांचं निधन - बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचं आजच्याच दिवशी 2017 मध्ये निधन झालं होतं. 1961 मध्ये धर्मपुत्र या चित्रपटातून शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी पोस्ट बॉक्स 999 या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत दीवार चित्रपटातील त्यांची जुगलबंदीही प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. त्यांनी जवळपास 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी 61 सिनेमे सोलो हिरो म्हणून गाजले, तर 55 चित्रपट मल्टिस्टारर होते.
अजित आगरकरचा जन्म -भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याचा चार डिसेंबर 1977 रोजी जन्म झाला होता. अजित आगरकरनं तीन्ही फॉरमेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं भारतासाठी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजित आगरकरनं 288 विकेट्स घेतले आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 58 विकेट्सची नोंद आहे. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 47 विकेट्स मिळाले आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरचं नाव चर्चेत आहे.
आजच्या दिवस इतर कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या -1888 - भारताचे प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद्र मजूमदार यांचा जन्म.1910 - भारताचे आठवे राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांचा जन्म.1919 - भारताचे माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचा जन्म1952 - इंग्लंडमध्ये स्मॉगच्या जाड थरामुळे हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागला.1959 - भारत आणि नेपाळ यांच्यात गंडक इरिगेशन अँड पॉवर प्रोजेक्टवर स्वाक्षरी झाली.1963 - बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी याचा जन्म1967- देशातील पहिले रॉकेट 'रोहिणी आरएच 75' थुंबा येथून लाँच करण्यात आले.1977 - इजिप्तविरुद्ध अरब फ्रंटची स्थापना झाली.1977 - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याचा जन्म1944 - हिज्बुल्लाह दहशतवाद्यांनी कुवैत एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले. यावेळी दहशतवाद्यांनी चार प्रवाश्यांची हत्या केली.1991 - लेबनॉनमधील शेवटच्या अमेरिकन ओलिसाला सात वर्षांच्या तुरूंगवासानंतर सोडण्यात आले.1996 - नासाने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 'मार्स पाथफाउंडर' अंतराळ यान अवकाशात सोडले.2004 - मारिया ज्युलिया मॅन्टीला (María Julia Mantilla) हिने मिस वर्ल्ड चा पुरस्कार जिंकला. 2006 - तीव्र वादळामुळे फिलिपाईन्समध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला.2017 - अभिनेते शशी कपूर यांचे निधन