सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामांमध्ये तोडला जाणाऱ्या मिरज तालुक्यातील भोसे गावाजवळील 400 वर्ष जुन्या वटवृक्षा प्रकरणी महत्त्वपूर्ण तोडगा निघाला आहे. या हायवेच्या सर्व्हिस रोडसाठी पर्याय काढून 400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. महामार्गाची रचना थोडीशी बदलून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी तात्काळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. अखेर काल (22 जुलै) नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून भोसेच्या वटवृक्षप्रकरणी मार्ग काढण्याचे आदेश एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले.


आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. "एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी इथे भेट देऊन 400 वर्ष जुन्या वटवृक्षाची पाहणी केली असं मला समजलं. त्यानंतर महामार्गावरील बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हे वृक्ष वाचलं आहे. माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी आभार मानतो. ज्यांनी हा मुद्दा निदर्शनास आणला आणि हे वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचेही ही आभार मानतो," असं आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.





वृक्ष वाचवण्यासाठी 'चिपको आंदोलन'
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावच्या हद्दीतील यल्लम्मा मंदिराजवळ सुमारे 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष उभा आहे. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्ते कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. या महामार्गासाठी रस्त्यावरील अनेक झाडे तोडली गेली, याला कुणी विरोध केला नाही. मात्र 400 वर्षांहून अधिक जुने हे झाड असल्याने त्याच्या बचावासाठी ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सरसावले होते. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारुन रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती. या महाकाय वटवृक्षानजीक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत सोशल डिस्टन्स ठेवत प्रतिकात्मक 'चिपको आंदोलन'ही केलं. पर्यायी मार्गाने रस्ता करुन हा वटवृक्ष वाचवावा अशी मागणी त्यांनी केली.


वारकऱ्याच्या विसाव्याचे ठिकाण
मिरज-पंढरपूर मार्गावरील हे भले मोठे वडाचे झाड असून या झाडाने अनेकांना सावली देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे या झाडाच्या मार्गावरुन पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काचे सावली देणारे हे झाड आहे. याठिकाणी असणाऱ्या मंदिराबरोबर हे झाड वारकऱ्यांना ऊन-पाऊस यापासून नेहमी रक्षण करत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे प्रत्यके वारकरी या झाडयाच्या आश्रयाला असतो. मिरज-पंढरपूर मार्गावरुन दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला शेकडो पालख्या जात आसतात. यातील बहुतांश पालख्याचा मुक्काम या वटवृक्षाखाली वर्षांनुवर्षे होत राहिला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना हा वटवृक्ष आजपर्यंत आसरा देत आला आहे.


संबंधित बातम्या


400 वर्षे जुन्या वटवृक्षाची कत्तल वाचवण्यासाठी सांगलीत उभे राहिले 'चिपको आंदोलन'


माझा इम्पॅक्ट | सांगलीतील 400 वर्ष जुन्या वटवृक्षासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार


SAVE OLD TREES! सयाजी शिंदेंच्या जुनी दुर्मिळ वाचवण्यासाठीच्या उपक्रमात आदित्य ठाकरेंचा पुढाकार