बीड: सतत चार वर्षांचा दुष्काळ व पर्जन्यमानातील घट यामुळे पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहिला नव्हता; परंतु शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने या धबधब्यावरुन धो- धो पाणी कोसळू लागले आहे.


वीस वर्षानंतर हा धबधबा एवढ्या वेगाने कोसळू लागल्याचे गावकऱ्यांचा दावा आहे. शंभर फुटापेक्षा जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत आहे. या धबधब्यावरील तलाव ओव्हरफ्लो झाला असून दोन धारांमधून पाणी कोसळत आहे.

येथील रामेश्वर मंदिरामुळे धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही सौताड्याची ओळख आहे. बीड व अहमनदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे निसर्गरम्य व विहंगम चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी खेचत आहे.