पालघर: डहाणू तालुक्यातील चिखले गावात समुद्रामार्गे 4 संशयित आल्याच्या संशयावरुन खळबळ उडाली.  पालघर पोलिसांनी या परिसरात रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. हे सर्च ऑपरेशन चिंचणी,नरपड,चिखले,बोर्डी भागात सुरु आहे.


काल संध्याकाळी एक मोटर सायकलस्वाराने चिखले गावच्या हद्दीत समुद्र किनाऱ्यावरुन लगबगीने 4 व्यक्ती रस्ता ओलांडून, चिखले गावच्या हद्दीत जाताना पाहिले. संशय आल्याने त्याने वाणगांव पोलिसांशी संपर्क साधला. वाणगांव पोलिसांनी घोलवड पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी चिखले गावात शोधमोहीम सुरु केली आहे.

या शोधमोहिमेमुळे सोशल मीडियावरुन विविध अफवांना पेव फुटले आहे.

काल रात्रीपासून ही शोधमोहिम सुरु आहे. गावातील लोकांनीही या शोधकार्यात पोलिसांना सहकार्य केलं. सुरक्षिततेच्या उपाययोजना आखल्या जात आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करु नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.