मुंबई : पंढरीच्या वारीनंतर आता श्रावण महिन्याला सुरुवात होत असून सर्वांनाच गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. देशभरात, त्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव (Ganpati Festival) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर, कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच. यंदाच्यावर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी (ST) महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या (Kokan) चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.


2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या.  यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे,उपलब्ध होणार आहे.
      
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.


202 विशेष ट्रेनही


गणेशोत्सवासाठी कोकणमध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखाचा होणार आहे. कोकणासाठी 202 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजारो चाकरमान्यांची ही परवड थांबवण्यासाठी  रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.  गणेशोत्सवासाठी मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणमध्ये जात असतात. या काळात बस किंवा ट्रेनचे बुकिंग मिळत नाही. त्यामुळे या काळात आता अतिरिक्त 202 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून आता एसटी महामंडळानेही तब्बल 4300 जादा बसेसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, कोकणवासियांना गावाकडं जाण्यासाठी आता सार्वजनिक वाहतूक सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. 


हेही वाचा


 कोकणासाठी 202 विशेष ट्रेन सोडणार, गणपतीसाठी चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखाचा; असं असेल वेळापत्रक