पुणे: पुण्यातील कचराकोंडीला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र कचराकोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करु शकलेली नाही.


ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्यानं शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळं आरोग्याचाही धोका निर्माण झाला आहे.

कचऱ्यावरुन काल पुण्यात आंदोलनं झाली. तर आजही राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार आहे. पुण्याच्या महापौरांच्या केसरी वाड्यातील घरासमोर कचरा टाकून मनसेनंही घोषणाबाजी केली.

कचराडेपोचं निधन झालं असं म्हणत फुरसुंगी आणि उरळीमधील गावकऱ्यांनी काल  अंत्ययात्रा काढली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

परदेश वारीवरुन परतलेले महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी कचराकोंडी फोडण्याचं आश्वासन दिलं. मात्र अजूनही महापालिकेला त्यात यश आलेलं नाही.

त्यामुळं काल फुरसुंगीत कचराडेपोचं निधन झालं असं म्हणत फुरसुंगी आणि उरळीमधील गावकऱ्यांनी अंतयात्रा काढली.

काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?

पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.

इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.

त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.

संबंधित बातम्या :

19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य

आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट

पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’

ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन 

पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे