सांगली : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 कामगारांना घेवून एसटी महामंडळाच्या 16 बसेस शुक्रवारी रात्री रवाना झाल्या आहेत. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वांना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देवून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मिरजेचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजीत देसाई , उपायुक्त स्मृती पाटील यांनी या लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची मागील महिन्याभरापासून खबरदारी घेतली होती. या 480 जणांची मागील महिन्याभरापासून जेवणाची सोय एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.


सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथील सुमारे 480 जण अडकले होती. हे सर्वजण एमआयडीसी सांगली -कुपवाडमध्ये विविध ठिकाणी कामधंदा करत होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आपाआपल्या गावी जाण्यासाठी हे सर्वजण एकत्र जमले पण वापस पाठवण्यात आले. त्यांच्या सांगली येथील निवासाच्या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिका यांनी या सर्व लोकांना परत पाठविले.



आजपर्यंत प्रशासनाने त्यांचे जेवण खाण्याची सोय केली होती. त्यानतंर केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी प्रयत्न केल्यामुळे सदर व्यक्तींना तामिळनाडूच्या सेलम या त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री अडकलेले सर्व परप्रांतीय कामगार हे महाराष्ट्र शासनाच्या विशेष 16 एसटी बसेस मधून रवाना झाले आहेत.

यावेळी या सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी केली गेली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जेवण घालून व पुरेसे अन्न देऊन त्यांना रवाना केले. तसेच कुपवाड एमआयडीसी मधील काही उद्योजकांनी या तामिळनाडूमधील 480 जणाचे एसटी भाडे देखील भरले. तसेच हे लोक ज्या भागात भाड्याने राहत होते त्याचे काही महिन्याचे भाडे देखील प्रशासनाने घर मालकांना सांगून माफ करण्यास सांगितले. या 480 परप्रांतीय कामगारांनी आपल्या घरी निघताना महाराष्ट्र शासन आणि सांगली जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणांचे आभार मानले.