सांगली : सांगलीत आयोजित सद्भावना एकता रॅलीत दरम्यान एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या कांबळे असं या मुलीचं नाव असून, रॅलीची सांगता झाल्यानंतर शाळेत परतत असताना भोवळ आली, यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.


कोरेगाव-भीमा प्रकरणाने सामाजिक वातावरण गढूळ झाले होते. हे वातावरण निवळावे आणि सामाजिक सलोखा वाढीस लागावा यासाठी सांगलीत आज सद्भवना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला सांगलीचे जिल्हाधिकारी तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील सहभागी झाले होते.

या रॅलीत जिल्ह्यातील नागरिकांसह शाळकरी मुलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. रॅलीमध्ये  ग. रा. पुरोहित कन्या शाळेची विद्यार्थिनी ऐश्वर्या कांबळे ही देखील सहभागी झाली होती. रॅलीची सांगता झाल्यानंतर ती शाळेकडे परतत होती. पण विठ्ठल मंदिरसमोर तिला भोवळ येऊन, ती बेशुद्ध झाली.

यानंतर तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर ऐश्वर्या मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांनी तातडीने शासकीय रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, ऐश्वर्या ही काही दिवसांपासून आजारी होती, तरीही ती रॅलीत सहभागी झाली होती. प्रकृती अस्वास्थामुळे तिच्या कुटुंबीयांनीही तिला रॅलीला सहभागी होण्यास नकार दिला होता, असं जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

संबंधित बातम्या

एकतेच्या मोठ्या आवाजाने समाजकंटकांच्या कानठळ्या बसतील : विश्वास नांगरे-पाटील