मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदाही गर्दी न करता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं अस आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरवर्षी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकरी जनतेची गर्दी होत असते. यंदा मात्र अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरातूनच जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चैत्यभूमी परिसरात लावण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी 10.55 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर जातील.


आंबेडकर जंयतीदिनी बाबासाहेब यांच्या चैत्यभूमी इथल्या स्मारकस्थळावरुन थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांचं प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केल जाणार आहे.


मुख्यमंत्र्यांचं आंबेडकरी जनतेला आवाहन 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केलं जाईल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.


रक्तदान करुन काँग्रेसचं बाबासाहेबांना अभिवादन
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मात्र जगावर आणि राज्यावर आलेल्या कोविडचं संकट पाहता महाराष्ट्र काँग्रेसने रक्तदान करुन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसतर्फे चेंबूरमध्ये राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडणार आहे. त्यानंतर देशातील आणि राज्यातील काँग्रेस नेते व्हर्च्युअल अभिवादन सभा घेणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण समाज माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी दिली आहे.


परभणीत साधेपणाने आंबेडकर जयंती साजरी होणार
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढण्याचा निर्णय एकमताने घेतला असून कॉलन्यांमध्येच कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन जयंती साजरी होणार आहे. पोलीस अधिकारी आणि दलित नेते, जयंती अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


भाकरीवर बाबासाहेबांची रांगोळी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चांदवड इथले कला शिक्षक देव हिरे यांनी आगळीवेगळी आजपर्यंत कुठेही न साकारलेली अशी बाजरीच्या भाकरीवर रांगोळी साकारली आहे. माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अनमोल कार्य बाबासाहेबांनी केलं. "आपु खाते त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे" या प्रसिध्द गीताचे शब्द बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. याच गीताच्या आधारावर देव हिरे यांनी आठ इंच व्यासाच्या भाकरीवर सहा इंच व्यासाची पोर्ट्रेट रांगोळी साकारत त्यावर बाबासाहेबांची सही काढली आहे. आजपर्यंत अशी कलाकृती कोणी साकारलेली नाही. कला शिक्षक देव हिरे यांनी ही आगळी-वेगळी कलाकृती साकारत महामानवाला अनोखं अभिवादन केलं. मागील वर्षी त्यांनी पाण्यात बाबासाहेबांची रांगोळी साकारली होती.