Maharashtra Weather Update : विदर्भासह राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार(IMD Forecast), विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या म्हणजेच रविवारी (16 मार्च) अकोल्यात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. परिणामी संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेनं शहरं तापली, पाऱ्याने चाळीशी ओलांडली
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सद्या विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्याचा पारा हा 40 डिग्रीच्या पार पोहचला आहे. अशातच आज (15 मार्च) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपुर (41.4) ब्रम्हपुरी (41.2) आणि वर्धा येथ 41 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काळात हेच तापमान सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितलं जातंय. साधारण 35 अंशांच्या पलीकडे तापमान हे मार्च महिन्याच्या शेवटाला विदर्भातील असतं. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेनं शहरं आणखी तापण्याची शक्यता आहे. परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठीचे उपाय
• तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
• हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
• प्रवासात पाणी सोबत ठेवा.
• मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते.
• उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
• तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
• तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
• पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
• तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
• ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा 'हायड्रेट' करण्यास मदत होते.
• जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
• तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
• पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.
हे ही वाचा